संस्थांची श्रीमंती कर्मचाऱ्यांमुळे वाढते फुलत जाते- श्री.विठ्ठलराव कांबळे
संस्थांची श्रीमंती कर्मचाऱ्यांमुळे वाढते फुलत जाते- श्री.विठ्ठलराव कांबळे
समाजामध्ये काम करणाऱ्या अशा विविध संस्थांची श्रीमंती , तेथील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या, प्रामाणिक व समर्पित भावनेमुळे तसेच तिथे शिकून मोठे झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या सामाजिक योगदानातून वाढते व फुलते.आपण एखाद्या संस्थेत काम करताना आपल्यावर कायम दडपण असते,त्यात कधीही बदल होत नाही, त्यामुळे संस्थेची कामे करताना उपक्रम ,प्रकल्प हे आपल्यासाठी आनंद पेरणारे उत्सव आहेत, असे समजावे.अशा सेवाभावी संस्थांच्या ध्येयपूर्तीसाठी परमेश्वराने आपली निवड करून आपल्याला पाठवले आहे, ते पूर्ण करण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण विभाग प्रांत कार्यवाह श्री विठ्ठलराव कांबळे यांनी केले.
राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० यशस्वी व्हायचे असेल तर शिक्षण संस्था चालविणारे संचालक, शिक्षक पालक यांनी पुढाकार घेऊन स्वागतशील व्हावे लागेल. बदल करावे लागतील.भविष्यवेधी दृष्टी ठेवावी लागेल . यासाठी अन्य संस्थांशी सहयोग करून समूह तयार करून एकमेकांना मदत करावी लागेल. शिक्षण संस्थांनी पुढाकार घेतल्यास समाजातून, उद्योग जगतातून सहज मदत उपलब्ध होऊ शकेल. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण विभाग प्रांत कार्यवाह श्री. विठ्ठलराव कांबळे यांनी केले. जोगेश्वरीच्या अस्मिता - सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक संस्थेने आयोजित केलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सेवाव्रती कर्मचाऱ्यांशी ' ' परिसंवाद' कार्यक्रमात ते बोलत होते.
गेल्या 46 वर्षापासून अस्मिता संस्था सामाजिक ,शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहे. संस्थेचे ' मनोहर हरिराम चोगले - अस्थिव्यंग चिकित्सा व पुनर्वसन केंद्र बोरिवली ', येथे सुरू करून एक प्रकारे दिव्यांगांसाठीची चळवळ यशस्वी केली. आज पर्यंत हजारो दिव्यांग मुलांना सामान्य मुलांप्रमाणे कौशल्यावर आधारित शिक्षण देऊन पालकांचेही समुपदेशन केले आहे, तसेच रोजगार निर्मिती करून स्वाभिमानाने जगण्याचा मार्ग दाखविला.
श्री विठ्ठलराव कांबळे यांनी याप्रसंगी मार्गदर्शन करताना समाजात अशी सेवाकार्य उभी करणाऱ्या, प्रेरित करणाऱ्या ,अस्मिता सारख्या असंख्य संस्था उभ्या राहिल्या पाहिजेत. अशा संस्थांच्या सेवाकार्याच्या कहाण्या समाजातील अनेक कार्यरत संस्था ,कार्यकर्ते ,तरुणापर्यंत प्रेरणा स्वरूपाने पोहोचल्या पाहिजेत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. अस्मिता संस्थेच्या कार्याची प्रशंशा करून त्यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर पारखी ,शिक्षण प्रकल्प प्रमुख श्री श्रीकांत खंडकर ,माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री संतोष फडतरे ,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.रचना पवार ,पूर्व प्राथमिक विभागाच्या सौ. क्षमा मोंडकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.