मालवणी मधील ६० गरीब महिलांची 2 कोटीची फसवणूक करणारे आरोपी वर्सोवा मध्ये मोकाट
![](http://maharashtranews9.com/wp-content/uploads/2024/06/IMG-20240627-WA0005-1-780x470.jpg)
घरे देण्याचे आमिष दाखवून ६० महिलांची फसवणूक करणाऱ्या दोघा भावांविरोधात गुन्हा दाखल
गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊन देखील आरोपी अविनाश भानजी आणि प्रमोद भानजी मोकाट
मालाड ,मढ येथील शिवाजी नगर परिसरात वास्तव्यास असलेल्या साधना शिवाजी भंडारे वय (४०) यांनी स्थानिक पत्रकार, संपादक अमोल भालेराव यांच्या कडे याबाबतीत लेखी तक्रार केली होती. आरोपी अविनाश भानजी यांनी 60 महिलांची फसवणूक केली असून पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे. अविनाश भानजी याने चेक द्वारे किती पैसे घेतले, रोख स्वरूपात किती रक्कम घेतली, यांचे पुरावे तसेच खोटे जागेचे नॉटरी पेपर तपास अधिकारी श्याम निघोट यांना देण्यात आले आहेत. तक्रारीनुसार मढ येथील शिवाजी नगरमधील सीटीएस क्रमांक ६७७ येथे ६० खोल्या देण्याचे आश्वासन आरोपींनी साधना भंडारे व इतर ५९ महिलांना दिले होते. यासंदर्भात आरोपींनी महिला मंडळातील ६० महिलांसोबत कागदोपत्री करार करून प्रत्येकी चार लाख रुपये घेतले, असे तक्रारीत म्हटले आहे.
![](https://maharashtranews9.com/wp-content/uploads/2024/06/IMG-20240627-WA0005-1-1024x768.jpg)
२० ऑगस्ट २०१६ ते २१ जून २०२४ या कालाधीत हा गुन्हा घडला. सामंजस्य करारानुसार या सर्व महिलांनी प्रत्येकी ४ लाख रुपये असे एकूण दोन कोटी ४० लाख रुपये आरोपींना दिले. पण त्या ठिकाणी अद्याप कोणत्याही प्रकारच्या खोल्या बांधून तक्रारदार महिलांना देण्यात आलेल्या नाहीत. तसेच त्यांना त्यांचे पैसेही परत मिळालेले नाहीत, असे साधना भंडारे यांनी तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीच्या आधारे मालवणी वरीष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्याम निघोट यांनी याप्रकरणी अविनाश भानजी व प्रमोद भानजी या दोन भावांविरोधात पोलिसांनी गु.र.क्र. 882/2024, कलम 406,420,465,468,471,34 भादंविसं गुन्ह्या अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सर्व तक्रारदार महिला गरीब असून छोटी-मोठी कामे करून आपला उदरनिर्वाह चालवतात. आरोपींनी त्यांच्याकडून चार – पाच हजार असे करून पैसे घेतले होते. तक्रारदार महिलांनी २०१६ पासून रक्कम जमा केली होती. सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी पाच – सहा महिलांना घरे देण्यात आली होती. पण या महिलांकडून रक्कम घेऊन अद्याप त्यांना घर देण्यात आलेली नाहीत. महत्वाचे म्हणजे या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन देखील ही अद्याप आरोपीस अटक करण्यात आले नसून आरोपी हे वर्सोवा गावात मोकाट फिरत असल्याचे दिसत आहेत.