मुंबईच्या महापौरपदी भाजपचा आक्रमक मराठी चेहरा सौ. रितू तावडे यांची निवड
महायुतीने मुंबईकर यांना दिलेला शब्द पूर्ण केला; अमित साटम (मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार)

मुंबईच्या महापौरपदी भाजपचा आक्रमक मराठी चेहरा सौ. रितू तावडे यांची निवड
महायुतीने मुंबईकर यांना दिलेला शब्द पूर्ण केला; अमित साटम (मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार)
मुंबई | प्रतिनिधी
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी सौ. रितू तावडे यांची निवड झाल्याने मुंबईच्या राजकारणात नवे पर्व सुरू झाले असल्याचे मत मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार अमित साटम यांनी व्यक्त केले. महायुतीने दिलेला शब्द पूर्ण केला असून मुंबईकरांच्या विश्वासावर शिक्कामोर्तब झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

महापौर निवडीनंतर प्रतिक्रिया देताना अमित साटम म्हणाले की, “मुंबईचा महापौर हिंदूच, मराठीच आणि महायुतीचाच होणार, हे आम्ही केवळ बोलून दाखवले नाही तर करून दाखवले आहे.” सौ. रितू तावडे यांच्या निवडीमुळे मुंबईकरांचा कौल पुन्हा एकदा स्पष्ट झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

उद्धव ठाकरे गटावर टीका करताना साटम म्हणाले की, “मुंबईची अस्मिता, मराठी स्वाभिमान आणि हिंदुत्वाशी तडजोड करण्याचा प्रयत्न मुंबईकरांनीच हाणून पाडला आहे.” मुंबई कोणाच्या राजकीय प्रयोगशाळेसाठी किंवा अहंकारासाठी नसून ती मराठी माणसाची, हिंदुत्वाची आणि विकासाची राजधानी असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

महायुतीने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली असून दुहेरी भूमिका, दुटप्पी हिंदुत्व आणि संधीसाधू राजकारणाला मुंबईत स्थान नसल्याचा स्पष्ट संदेश या निवडीतून मिळाल्याचे साटम यांनी स्पष्ट केले.
नवनिर्वाचित महापौर सौ. रितू तावडे यांचे अभिनंदन करत त्यांनी त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.




