महाराष्ट्राची जीवनवाहिनी ठप्प एसटी कामगारांचा संप चिघळला

अनिरुध्द कदम दापोली प्रतिनिधी,
दापोली : महाराष्ट्राची जीवनवाहिनी ठप्प झालीय. एसटी कामगारांचा संप चिघळला आहे. आज राज्यात एसटी कामगारांचा संप सुरू आहे. विविध एसटी स्थानकातली वाहतूक ठप्प आहे. दापोली आगारात ही कामबंद आंदोलन सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागाची जीवनवाहिनी एसटी ठप्प आहे. राज्यभरातील तब्बल २२० डेपो बंद आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत राज्य सरकार दुपारपर्यंत अध्यादेश काढणार आहे. ज्यात या संपाबाबत त्रिसदस्यीय समिती स्थापन करून या मुद्यावर चर्चा करू अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे. संप न करण्याचे स्पष्ट आदेश देऊनही कामगारांचा संप अद्याप सुरूच आहे. पण तरीही आमचा कामगारांच्या प्रती सहानुभूतीचाच दृष्टीकोण आहे, असे न्यायमूर्ती एस. काथावाला आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने स्पष्ट केले. पण सरकारकडून या गोष्टी लिखित स्वरूपात येत नाहीत तोपर्यंत हा संप सुरूच ठेवण्याची भूमिका एस.टी. कामगार संघटनेनं घेतली आहे.
दरम्यान, आज सकाळी न्यायमूर्ती एस. काथावाला यांच्या दालनात ही सुनावणी पार पडली. कामगारांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी जी समिती नेमण्यात येणार आहे त्यात राज्याचे मुख्य सचिव, अर्थ आणि परिवहन खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांचा समावेश असेल. ही समिती ताबडतोब स्थापन करून तातडीनं त्यांची पहिली बैठक दुपारी ४ वाजेपर्यंत घ्या, आणि या बैठकीचे तपशील संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हायकोर्टात सादर करा.
याशिवाय या समितीसमोर एस.टी. कर्मचा-यांना शासकीय सेवेत समाविशिष्ठ करण्याचा मुख्य मुद्दा असावा असं नमूद करत पुढील १२ आठवड्यांत या समितीनं आपला अहवाल सादर करावा असे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. कामगारांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी राज्य सरकार अभ्यास समिती स्थापन करणार आहे. आज दुपारी समितीचा जीआर जारी करण्यात येणार आहे.



