आमची मुंबईमुंबईविशेषसामाजिक

सद्भावना सेवा समिती रजि. मुंबई तर्फे प्रेरणादायी महिलांचा गौरव नारी सन्मान पुरस्कार २०२५

"संघर्षाच्या भूमीवरच कार्याचा गौरव" ज्या ठिकाणी त्या कार्यरत आहेत, तिथेच त्यांचा आदरपूर्वक सत्कार

सद्भावना सेवा समिती रजि. मुंबई तर्फे प्रेरणादायी महिलांचा गौरव नारी सन्मान पुरस्कार २०२५

मुंबई वमहिला सशक्तीकरण हा केवळ शब्द नसून तो कृतीतून साकारला जातो. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणाऱ्या महिलांना योग्य तो सन्मान देणे हे सामाजिक संस्थांचे कर्तव्य आहे. हाच अनोखा विचार पुढे नेत सद्भावना सेवा समिती रजि. मुंबई यांनी ‘नारी सन्मान पुरस्कार २०२५’ चा एक वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबवला. इतर पुरस्कार समारंभां प्रमाणे स्टेजवर बोलावून सन्मान न करता संस्थेचे ट्रस्टी श्री. सुनिल जैन खाबिया आणि त्यांच्या टीमने थेट या महान महिलांच्या कार्यस्थळी भेट देऊन त्यांना सन्मानित केले. यामागील संकल्पना म्हणजे “संघर्षाच्या भूमीवरच कार्याचा गौरव” ज्या ठिकाणी त्या कार्यरत आहेत, तिथेच त्यांचा आदरपूर्वक सत्कार करणे.

सद्भावना सेवा समिती रजि. मुंबई ही २० वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली एक नोंदणीकृत संस्था (रजि. नं. १४६०) आहे, जी वंचित, गरीब आणि गरजू लोकांसाठी अन्नदान, शिक्षण, आरोग्य, आणि महिला सशक्तीकरणासाठी सातत्याने कार्यरत आहे. वंचितांसाठी मोफत अन्नदान आणि वस्त्रदान उपक्रम,गरजू मुलांसाठी शालेय साहित्य, कौशल्यविकास आणि शिक्षणाची संधी, महिला सशक्तीकरणासाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण आणि मदत योजना, आरोग्य तपासणी असे अनेक उपक्रम राबविले जातात. २० वर्षांमध्ये संस्थेने हजारो लोकांचे जीवन उज्ज्वल केले असून, समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा त्यांचा संकल्प आहे.

सत्कारमूर्ती :

सौ. आरती नागराज – संचालक, अभ्युदय-SPJIMR
शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तन हेच ध्येय समोर ठेवून ‘अभ्युदय’ या उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी २००८ पासून १०००+ मुलांचे जीवन उज्ज्वल केले. गरीब आणि वंचित मुलांना उत्तम शिक्षण मिळावे, त्यांना भविष्याचा आत्मविश्वास द्यावा, हा त्यांचा उद्देश आहे.

 

सौ. वंदना पाकळे – वरिष्ठ संचालिका, कॉर्पोरेट अफेयर्स मॅक्स हेल्थकेअर नानावटी
मॅक्स हेल्थकेअर नानावटी रुग्णालयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत त्यांनी गरजू आणि गरीब लोकांसाठी आरोग्यसेवा अधिक सुलभ केली आहे. समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळाव्यात, यासाठी त्या झटत आहेत.

 

श्रीम . योगिनी दीदी – संचालिका, बीएसईएस हॉस्पिटल, ब्रह्माकुमारी
आध्यात्मिक जागरूकता आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी त्या कार्यरत आहेत. जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी योग्य दिशा मिळावी, सकारात्मक ऊर्जा वाढावी यासाठी त्यांनी हजारो लोकांचे मार्गदर्शन केले आहे.

श्रीम . निलीमा झुंझुनवाला – शारदा फाउंडेशन
महिला सशक्तीकरण, वंचित बालकांचे शिक्षण आणि सामाजिक विकासासाठी त्यांनी अनेक समाजोपयोगी प्रकल्प राबवले आहेत. गरजू कुटुंबांसाठी शिक्षणसामग्री, रोजगारनिर्मिती आणि कौशल्यविकासाच्या माध्यमातून त्या समाजाच्या उन्नतीसाठी कार्यरत आहेत.

सदभावना सेवा समितीचे ट्रस्टी सुनिल जैन खाबिया यांनी “सन्मान म्हणजे केवळ पुरस्कार नव्हे, तर तो प्रेरणेचा स्रोत असावा” या विचारातून नवा पायंडा घालून दिला.त्यांनी या चार महिलांच्या कार्यालये आणि सेवास्थळी जाऊन त्यांचा सत्कार केला, जेणेकरून त्यांच्या कार्याची महत्ता समाजाच्या समोर येईल. समाजातील खऱ्या नायकांना लोकांसमोर आणण्यासाठी हा अनोखा उपक्रम राबवला गेला. एका कार्यक्रमाच्या व्यासपीठावर बोलावण्याऐवजी त्यांचे कार्य ज्या ठिकाणी सुरू आहे त्याच ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आला. या स्त्रीशक्तींनी “स्वतःला घडवले आणि समाजासाठी दीपस्तंभ झाल्या” म्हणूनच या पुरस्काराने त्यांच्या कार्याचा उचित गौरव केला गेला. महिला सक्षम झाल्या की संपूर्ण समाज सक्षम होतो. ‘नारी सन्मान पुरस्कार २०२५’ हा केवळ एक पुरस्कार नसून, एक चळवळ आहे महिलांना त्यांच्या कर्तृत्वाचा उचित सन्मान देण्याची आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्याची!

सदरवेळी सदभावना सेवा समितीचे सीए कपिल कर्णावट, श्री सुधीर खाबिया, डॉ. भव्य जैन, सीए आशिष चोप्रा, प्रा. विजय महाजन व अन्य सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button